धम्म लिपी की ब्राह्मी लिपी
धम्म लिपी की ब्राह्मी लिपी
काही तथाकथित लिपि तज्ञांनी व इतिहासकारांनी महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाला पत्र लिहून धम्मलिपि शब्दा ऐवजी ब्राह्मी म्हणावे अशी विनंती केली आहे व पाठ्यपुस्तकातून ते वगळावे असे लिहिले आहे व हे पत्र त्यांनी जाहीर केले आहे.
या मंडळींना माझे जाहीर आव्हान, हो आव्हानच... त्यांनी ब्राह्मी लिपि असावी असा एकतरी संदर्भ दाखवावा... आम्ही धम्मलिपि ऐवजी ब्राह्मी म्हणू, मात्र सारे संदर्भांची पुरावे असावेत, ते वस्तुनिष्ठ असावेत आणि मुख्य म्हणजे व्याकरणाच्या कसोटींवर टिकायला हवेत. मी खालील विचार मांडतो आहे धम्मलिपि विषयी. द्या तुम्हीं उत्तर....हे ओपन चॅलेंज आहे.
भारतामध्ये लिखाणाचा इतिहासाची सुरुवात होते ती सम्राट अशोकांच्या शिलालेखांपासून. त्याआधीच्या कुठल्याही लिखाणाचा पुरावा सापडत नाही. काही हरप्पन सिलस् सापडले आहेत मात्र त्यावरची अक्षरे किंवा चित्रे यांच्याबद्दल अजूनही एकमत होत नाही.
1836 साली जेम्स प्रिंसेप यांनी अशोकांच्या शिलालेखांचे सर्वात पहिल्यांदा लिप्यांतरण केले व त्यातील पालि प्राकृत भाषेच्या शिलालेखांचे सर्वात पहिल्यांदा वाचन झाले. या लिपीला काय म्हणावे हा प्रश्न प्रिन्सेपला देखील पडला होता, मात्र कुठल्याही पुराव्या अभावी त्याने या शिलालेखांच्या लिपिला इंडिक स्क्रिप्ट हे नाव दिले. कालांतराने जेव्हा त्याची खात्री झाली कि हे सर्व शिलालेख सम्राट अशोक यांनी लिहिले आहे त्यावेळेस त्याने या लिपिला अशोकन स्क्रिप्ट देखील म्हटले आहे.
पुढे टेरिन द लेकॊपेरी याने अशोकांच्या लिपिला ब्राह्मी हे नाव दिले. (काहीजण याला ब्राम्ही असे म्हणतात). त्याचा आधार होता ललितविस्तार या बौद्ध महायानी ग्रंथाचा आणि समवायांगसूत्र या जैन ग्रंथांचा. हे दोन्हीही ग्रंथ लिहिले आहेत अंदाजे इ.स. चवथ्या ते सहाव्या शतकात. या ग्रंथांचा आधार घेत टेरिन द लेकॊपेरी लिहितात की, डावीकडून उजवीकडे लिहिली जाणारी ब्राह्मी लिपि आहे तर उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी खरोष्ठी लिपि आहे. हे असे का या प्रश्नाचे उत्तर टेरिन द लेकॊपेरीने दिले नाही किंवा नंतरच्या अभ्यासकांनी ते दिले नाही. (आणि ते देऊ शकणार नाही याची खात्री आहे) अशोककालीन लिपिला टेरिन द लेकॊपेरीने आणि इतरांनी ब्राह्मी का म्हटले याची काही कारणे अशी आहेत -
1. जैन धर्माची अशी समजूत आहे की, भगवान ऋषभदेवाने त्यांच्या मुलीला (जिचे नाव बंभी होते), तिला शिकवताना ज्या लिपीचा उपयोग केला त्या लिपिला मुलीच्या नावावरून बंभी हे नाव दिले. याला कुठलाही पुरावा नाही.
2. 13 व्या शतकात जन्मलेल्या सायनाचार्य (ज्यांनी निश्चितच आधीचे बौद्ध आणि जैन ग्रंथ वाचले असणार) लिहितात - ब्राह्मी: ब्राह्मणप्रेरितः यही महत्य: ऋतस्य यज्ञस्य मातरः निर्मात्र्य: स्तुतय: ब्राह्मणांनी उच्चरलेली आणि स्तुतींमध्ये प्रशंसेसाठी वापरलेली लिपि म्हणजेच ब्राह्मी लिपि होय. याचा आधार म्हणजे नारदस्मृतीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने निर्माण केलेली लिपि म्हणजे ब्राह्मीलिपी होय.
3. टेरिन द लेकॊपेरीचे म्हणणे बुह्लेर आणि इतर संशोधकांनी लगेच उचलून धरले (त्याला वेगळी कारणे आहेत).
4. प्रा. विश्वभरशरण पाठक या अर्वाचीन संस्कृततज्ञाने ऋग्वेदमध्ये आलेला ब्रह्मी शब्द हा वैदिक काळातील असून, अशोकाची लिपि ही वैदिक काळातील ब्रह्मी आहे आणि म्हणून तिला ब्राह्मी लिपि म्हणावे असे लिहिले आहे. म्हणजेच ब्राह्मी लिपि हिचे अस्तित्व वैदिक काळापासून आहे असे त्यांचे म्हणणे. (हे वैदिक ग्रंथ पहिल्यांदा केव्हा लिहिले गेले हा प्रश्न विचारायचा नाही.)
5. लगेचच इथल्या संशोधकांनी भारताच्या या प्राचीन लिपिला ब्राह्मी हे नाव देऊन मोकळे झाले ज्याची री पाश्चात्य (पुरस्कृत) संशोधकांनी ओढली.
आता काही सत्यता पडताळू -
1. ज्या जेम्स प्रिन्सेपने ही अशोककालीन लिपि शोधून काढली त्याने कधीही या लिपीला ब्राह्मी म्हणून संबोधले नाही. उलट जेव्हा त्याच्या कार्यालयातील ब्राह्मणांनी त्याला हे नाव सुचविले तेव्हा त्याने पुराव्या अभावी धुडकावून लावले व त्याच्या प्रत्येक लिखाणात इंडिक स्क्रिप्ट किंवा अशोकन स्क्रिप्ट हे शब्द वापरले.
2. मुळातच ललितविस्तार किंवा समवायांगसूत्रात लिहिलेली ब्राह्मी व खरोष्ठी लिपि या अशोकालीन लिपीच आहेत याचे कुठलेही पुरावे टेरिन द लेकॊपेरीने दिलेला नाही. बरं, या दोन लिपि सोडून या ग्रंथामध्ये नवे टाकलेली इतर लिपि कोणत्या आणि त्याचे पुरावे काय तर हे महाशय आपले गप्प!
3. रिचर्ड सालोमन या प्रसिद्ध लिपीतज्ञाने इंडियन इपिग्राफी या ग्रंथात लिहिले आहे कि - .....it should be kept in mind that we do not know precisely what form or derivative of the script the authors of the early script lists were referring to as Brahmi nor whether this term was actually applied to the script used in the time of Ashok.
4. सम्राट अशोक यांनी लिहिलेले काही शिलालेखांचे अंश आपण पाहू यात -
इयं धंमलिपि देवानांप्रियेन प्रियदसिना राञा लेखापिता, यदा अयं धंमलिपि लिखिता, एताये आठाये इयं धंमलिपि लेखिता अथाय अयं धंमलिपि लेखापिता किं च, अयं धंमलिपि देवानांप्रियेन प्रियदसिना राञा लेखापिता- हे सर्व शिलालेख गिरनार येथील आहे.
अयं च लिपि तिसनखतेन सोतविया, एताये आठाये इयं धंमलिपि लेखित - हे दोन्ही शिलालेख धौली येथील आहेत.
इयं च लिपि आनुचातुंमासं सोतविया तिसेन- हा शिलालेख जौगड येथील आहे.
हेदिसा च इका लिपि तुफाकंतिकं हुवाति संसलनसि निखिता इकं च लिपिं हेदिसमेव उपासकानंतिकं निखिपाथ- हा सारनाथ येथील लघुस्तंभ शिलालेख आहे.
सडुवीसतिवस अभिसितेन मे इयं धंमलिपि लेखापिता, इयं धंमलिबि अत अथी सिलाथंभानि वा सिलाफलकानि वा तत कटाविया एन एस चिल ठीतिके सिया- हे शिलालेख टोपरा येथील स्तंभावर आहेत.
असे आणखी बरेच शिलालेख, स्तंभलेख सम्राट अशोक यांनी आमच्यासाठी लिहून ठेवले आहेत. वरील शिलालेखाच्या काही उदाहरणावरून लक्षात येते की, यात लिपि आणि लेखापिता किंवा लेखिता हे शब्द वापरले आहेत. म्हणजेच अक्षर किंवा वाक्य किंवा लेख लिहिण्यासाठी अशोकाने धम्मलिपीचा उपयोग केला आहे. काही स्वयंघोषित लिपितज्ञ म्हणतात की, अशोकांच्या वाक्याचा अर्थ असा होतो की, हा धम्मलेख देवांचा प्रिय असलेल्या राजाने लिहिला आहे म्हणजे त्यांना असे म्हणायचे आहे की धम्मलिपी म्हणजे धम्मलेख! पण जर अशोकाला धम्मलिपी म्हणजेच धम्मलेख असे सुचवायचे होते तर त्याने स्पष्टपणे लिहिले असते की इयं धम्मलेख......लेखापिता. त्याला मग धम्मलिपी लिहिण्याचे काही कारणच नव्हते! नाहीतरी लेख हा शब्द अशोकांना माहित होताच ना? दोन्ही ठिकाणी लेख लिहिला असतं तर काम झाले असते!
पण सम्राट अशोकाने धम्मलिपि हा शब्द लिहिला कारण त्याकाळी ज्या काही लिपि अस्तित्वात होत्या, त्यातली धम्मलिपि ही दगडावर लिहिण्यास अतिशय योग्य असावी आणि म्हणूनच अशोकाने या लिपित हे सर्व शिलालेख लिहिले. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याच्या राज्यातील सर्व लोकांना ही धम्मलिपि वाचता येत असावी अन्यथा अशोकांनी सर्व राज्यभर वेगवेगळ्या लिपीत हे सारे लेख लिहिले असते. तिसरे महत्त्वाचे व्याकरणिक कारण म्हणजे लिपि आणि लेख या दोन्हीही शब्दाचे धातू वेगवेगळे आहेत. लिपि हा शब्द लिप धातूपासून तयार होतो तर लेख हा शब्द लिख धातूपासून तयार होतो. हे दोन्हीही शब्द अर्थाने आणि सूचकतेने वेगवेगळे आहेत. लिप म्हणजे लिहिणे आणि लेख म्हणजे जे लिहिले आहे ते. भाषा आणि लिपि यावर भाष्य करताना थोडा व्याकरणाचा देखील अभ्यास हवा!!!
सम्राट अशोकांच्या धम्मलिपि ला नाकारण्याचे मुख्य कारण म्हणजे येथील भाषातज्ञांना वा लिपीतज्ञांना सम्राट अशोकाच्या धम्मलिपि शब्दाबद्दल असलेली ऎलर्जी ! द्वेषमूलक मानसिकतेने पछाडलेले हे लोकं सम्राट अशोक यांना कुठलेच क्रेडिट द्यायला तयार नाहीत. म्हणून तर सहा सोनेरी पानेमध्ये शुंगाचा जयजयकार आहे पण अशोकाचे नाव देखील नाही!
भारतात आजमितीस 2.5 कोटी हस्तलिखिते (भूर्जपत्रे, ताडपत्रे, कातडीपत्रे इत्यादी), ताम्रपत्रे, शिलालेख, स्तंभलेख, प्रस्तरलेख, खापरा वरचे लेख, लाकडावरचे लेख, कापडीलेख.... डॊक्युमेंटेड आहेत. माझ्या पाहणीत एकाही वरील माध्यमात ब्राह्मी हा शब्द लिपिसाठी वापरण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे अगदी कुटील लिपि, सिद्धमात्रिका लिपि, शारदा लिपि, देवनागरी लिपि अशी नावे अनेक हस्तलिखितांमध्ये येतात पण ब्राह्मी मात्र येत नाही! का? जर ब्राह्मी एवढी प्राचीन व पूजनीय आहे तर सम्राट अशोकांनंतरच्या राजांनी का बरे तिचा उल्लेख केला नाही?
जे बौद्ध आणि जैन ग्रंथांचा उल्लेख करतात, ते हे विसरतात की, हे ग्रंथ इ.स. चवथ्या शतकानंतर लिहिलेले आहेत आणि त्यात अनेक काल्पनिक मांडणी देखील आहे. आज उपलब्ध असलेल्या कुठल्याही ग्रंथापेक्षा अशोकाचे शिलालेख हे सर्वात प्राचीन आणि म्हणूनच विश्वसनिय आहेत. सम्राट अशोकानंतर आलेल्या राजांच्या काळात या धम्मलिपिच्या लिखाणात कालौघात फरक पडला आणि त्यांच्यातील फरक व्यवस्थित अभ्यास करता यावा म्हणून अभ्यासकांनी त्या त्या काळातील शिलालेखांना त्या त्या राज्यकाळाचे नाव दिले. उदा. शुंग लिपि, कुषाण लिपि, गुप्त लिपि....या सर्व लिपि सम्राट अशोकांच्या धम्मलिपितूनच तयार झाल्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. एका महाशयांनी खारवेलच्या शिलालेखाचा उल्लेख केला आहे. या शिलालेखात दुसर्या ओळीत लिहिले आहे की, या राजाने बालपणाच्या पंधरा वर्षात लेख, गणन, रुप्य व्यवहार, सामाजिक आणि धार्मिक न्याय शिकला होता. यात लेख म्हणजे लेखन कला, लिपि नव्हे!
आज भारतातील एकही भाषा संशोधक किंवा लिपीतज्ञ ब्राह्मी लिपि बद्दल योग्य उत्तर किंवा पुरावा देऊ शकत नाही, शकणार नाही.... मात्र तरीही ते ब्राह्मी लिपीच म्हणणार कारण ती त्यांची मानसिकता आहे. ब्रह्म किंवा धर्माशी जोडलेल्या शब्दाला ते नकार कसा देणार?
सम्राट अशोकांच्या लिपिला ब्राह्मी का म्हणायची याचा एक तरी पुरावा जाणकार संशोधकांनी द्यावा.. उगीच एवढी पोटदुखी का करून घेताय?
- अतुल भोसेकर (मुंबई) मो. 9545277410


0 Comments