खरा शिक्षक दिन

 ‘दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे !

भिक्षान्न मागावे ! पोटापुरते !

विद्वान वृद्धांनी विद्यादान द्यावे ! 

भिक्षेकरी व्हावे ! गावांमध्ये !’

‘जगातील कोणताही धर्म ईश्‍वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे सांगणारे महात्मा जोतीराव फुले यांनाच राजर्षी शाहू महाराज भारताचे मार्टिन ल्यूथर म्हणून संबोधतात. तर महाराणा सयाजीराव गायकवाड हे भारताचे वॊशिंटन म्हणतात. ते शिवजयंतीचे प्रणेते तसेच पुणे येथील पहिली मुलींची शाळा सुरू करून बहुजन समाजातील घरात शिक्षणाची ज्योत पेटवण्याचे काम करणारे पहिले शिक्षक महात्मा फुले. त्यामुळेच काही सामाजिक संघटना महात्मा जोतिबा फुलेंच्या नावाने खरा शिक्षकदिन साजरा करताना दिसतात पण ते आजही आमच्या बहुजन समाजाला समजले नाही हीच खूप मोठी शोकांतिका आहे.

महात्मा जोतिबा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. शाळेत शिकत असताना त्यांनी पाच-सहा वर्षातच अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांची बुद्धी अतिशय तल्लख होती. त्यामुळे ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्त्याने महात्मा फुले यांना ‘सेंद्रीय बुद्धीवंत’ असे संबोधले आहे. तर राधाकृष्णन यांचा जन्म 05 सप्टेंबर 1888 साली झाला. तर महात्मा फुलेंनी राधाकृष्णन यांच्या जन्माच्या 40 वर्षांपूर्वी म्हणजेच 01 जानेवारी 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.1852 मध्ये शाळा स्थापन केली. तर मग शिक्षकदिन राधाकृष्णन यांच्या नावाने साजरा कसा होतो? हा प्रश्‍न आमच्या तरुणांना पडत का नाही. राधाकृष्णन यांनी उभ्या आयुष्यात एकही शाळा सुरू केली नाही. पण त्यांच्या जन्मापुर्वी केवळ चार वर्षात महात्मा फुलेंनी 20 शाळा सुरू करून विद्यादानाचे मोफत कार्य केले. राधाकृष्णन यांनी विद्यावेतन घेऊन एकाही बहुजनांच्या मुलांना शिकवल्याचा पुरावा नाही तर मग शिक्षक दिन राधाकृष्णन यांच्या नावाने साजरा करायचा का? हा प्रश्‍न बहुजन समाजातील तरुणांना पडला पाहिजे.

जोतीरावांनी पत्नी सावित्रीमाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीमाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत.

महात्मा जोतिबा फुले यांचे विचार विज्ञानवादी, प्रयत्नवादी, अनिष्ट प्रथा, चालिरिती, स्वर्ग नरक या काल्पनिक संकल्पना त्यांना मान्य नव्हत्या तर राधाकृष्णन हे दैववादी, परंपरावादी, स्वर्ग नरक यावर विश्‍वास ठेवणारे लग्न हे स्वर्गातच जुळतात अशी मांडणी करणारे खरे शिक्षक असू शकतात का? तसेच महात्मा जोतिबा फुलेंनी बालविवाह रोखण्यासाठी विरोध केला तर विधवा पुनर्विवाहाचा प्रोत्साहन दिले तर राधाकृष्णन यांनी स्वत:च्या मुलींचा विवाह बालवयात केला म्हणजेच राधाकृष्णन यांना बालविवाह मान्य होते हे स्पष्ट दिसून येते.

महात्मा फुलेंनी ‘चूल आणि मुल’ या धर्मव्यवस्थेवर आघात करून स्वत:च्या पत्नी सावित्रीमाईंना शिक्षण देऊन स्त्रियांसाठी देशात 01 जानेवारी 1848 रोजी सर्वप्रथम सुरूवात केली तसेच ‘स्त्रियांचा जन्म मानवी उत्कर्षासाठी’ असे म्हणत तसेच त्यांनी अज्ञान, अंधश्रध्दा, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता, स्त्रीशिक्षण या ज्वलंत प्रश्‍नांसाठी आयुष्यभर लढा दिला तर राधाकृष्णन यांनी स्वत:च्या पत्नीला अशिक्षित ठेऊन फक्त चूल आणि मूल ही ब्राम्हणी व्यवस्था सिध्द करून दाखवली तसेच ‘स्त्रियांचा जन्म सेवेसाठीच आहे’ असे त्यांचे मत होते. एकही लढा दिला नाही. 

महात्मा जोतिबा फुलेंचे चारित्र्य सुर्यप्रकाशासारखे स्वच्छ व तेजस्वी आणि आदर्श होते तसेच त्यांनी तथागत गौतम बुद्ध, महासम्राट बळीराजा, छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेरणास्थान समजून प्रबोधनास सुरूवात केली तर राधाकृष्णन यांचे आदर्श म्हणजे विनायक दामोदर सावरकर होते. मग हेच सावरकर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॊ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खालच्या स्थरावर लिखाण करतात तेव्हा राधाकृष्णन यांचे चरित्र कसे असेल हे वेगळे सांगण्याची गरज काय?

महात्मा जोतिबा फुलेंना बहुजन समाजातील गरीबांची तळमळ होती म्हणून तर त्यांनी ‘गुलामगिरी, शेतकर्‍याचा आसूड, ब्राम्हणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म तसेच देशातील पहिले नाटक तृतीय रत्न लिहिले. फुलेंच्या साहित्यामुळे पुरोगामी विचारांची बिजे पेरली गेली. त्यामुळे याच प्रेरणेतून अनेक संघटना निर्माण झाल्या तर राधाकृष्णन हे वैदिक, सनातनी साहित्याचे लेखक होते. (संदर्भ दै. देशोन्नती, इतिहास संशोधक, श्रीमंत कोकाटे 05 सप्टें. 2019)  

त्यांनी फक्त ब्राम्हणांच्या उदात्तीकरणासाठी ब्रम्हसुत्र, वेदातील नितीशास्त्र, धर्म आणि समाज आणि शृंगारिक साहित्यात ‘लीलाचा गुन्हा’ ही कादंबरी टोपण नावाने लिहिली तेव्हा प्रतिगामी विचारांची बिजे पेरली गेली. त्यामुळे बहुजनांसाठी देशात एकही संघटना निर्माण झाली नाही.

महात्मा जोतिबा फुलेंनी हंटर कमिशन आयोगास प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करा म्हणून इंग्रजांना निवेदन दिले. परंतु राधाकृष्णन यांच्याच काही पिलावळीमधील कुंटे यांनी हंटर कमिशन आयोगास बहुजनांना शिक्षणाची गरज नाही. (संदर्भ खरा शिक्षक दिन, लेखक श्रीमंत कोकाटे).

राधाकृष्णन यांनी राजदूत, राष्ट्रपती, कुलगुरू अशी पदे उपभोगली त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. पण महात्मा जोतिबा फुलेंनी सत्यशोधक समाज संस्थापक, शिवजयंतीचे जनक, शेतकरी, कामगार, नाभिक यांच्या संघटना स्थापन करून सार्वजनिक कार्यास सुरूवात केली. त्यामुळे त्यांच्या वाट्याला पुरस्कार नव्हे तर ब्राम्हणांचा तिरस्कार प्राप्त झाला. परंतू जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना 1888 मध्ये मुंबईतील कोळीवाडा येथील सभेत रावबहादूर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. आज कोणालाही भेटणार्‍या भारतरत्न पुरस्कारापेक्षा किती तरी पटीने महात्मा ही पदवी श्रेष्ठ आहे. 

महात्मा ज्योतिबा फुले हे एक उत्तम साहित्यिक, प्रतिभावंत संशोधक होते तर राधाकृष्णन हे कसे आणि काय करत होते हे विश्‍वविख्यात तत्ववेत्ते आचार्य रजनीश यांनी त्यांच्या (संदर्भ - ज्यूं मछली बिन नीर, पृष्ठ क्र.170,171) या पुस्तकात लिहिले आहे. तसेच राधाकृष्णन हे स्त्री शिक्षणाच्या विरुद्ध होते, असे त्यांचे चिरंजीव डॊ.सर्वपल्ली गोपाल सांगतात.(स्त्रह्ल. श्स्र्खश् जबघभखथश्  ुघधह्रबश्ऽखस-ट्टर्.ेंधऽश्झ)

आज जगभर मुक्त विद्यापीठे सुरू झाली आहेत. त्यामध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा विद्यापीठातून लाखोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे महात्मा जोतिबा फुले यांच्या शैक्षणिक विचारांचे एक गोड फळच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण मुक्त शिक्षणाची संकल्पना ही महात्मा जोतिबा फुले यांचीच आहे.

‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगांचा महात्मा फुलेंचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले आहेत. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. त्यांनी आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केलेला आहे. तसेच ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा त्यांचा अप्रकाशित ग्रंथ आहे. महात्मा जोतिबा फुले यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1990 रोजी झाला. तसेच सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. 1891 मध्ये प्रकाशित झाला. 

त्यामुळे आज आमच्या बहुजन समाजातील लोकांनी शिक्षकांनी शाळेत, तरुणी तरुणींनी गावागावात 05 सप्टेंबर ऐवजी महात्मा जोतिबा फुलेंचा स्मृतीदिन 28 नोव्हेंबर हा खरा शिक्षकदिन म्हणून साजरा करावा लागेल. तेव्हा खर्‍या अर्थाने महात्मा जोतिबा फुलेंच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हेच खरे अभिवादन ठरेल हे मात्र निश्‍चित !.

सत्यशोध होता, धिक्कारी तो कवी ! 

तोच सत्यवादी ! ‘जोती म्हणे !

- नवनाथ दत्तात्रय रेपे

मो. 9762636662